spot_img
अहमदनगरअसुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस!

असुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस!

spot_img

सारिपाट| शिवाजी शिर्के :-
कोलकात्यातील डॉटर तरुणीपेक्षा, बदलापूरातील दोन लहान मुलींवर शाळेतच झालेल्या अत्याचारापेक्षा आईच्या गर्भातच स्त्रीभ्रूणहत्येला सामोर्‍या जाणार्‍या मुली किती तरी नशीबवान म्हणायच्या. बलात्कार हा त्या व्यक्तीविरोधातील व्यक्तिगत गुन्हा नाही, तर तो पुरुषसत्ताक मानसिकतेने केलेला ‘राजकीय’ गुन्हा आहे, हे मुलींच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. दर काही काळाने म्हणजेच कोलकत्ता, बदलापूर अशा घटना घडल्या की चीड, उद्विग्नता, हताशा घेऊन मोर्चे काढायचे आणि तिच्या जागी आपली लेक नव्हती याचे समाधान मानायचे! दुसर्‍या भाषेत बोलायचे तर शिवाजी महाराज दुसर्‍याच्या घरात जन्माला आले पाहिजेत असंच! आपल्या लेकीवर बलात्कार झाला नाही याचे समाधान मानण्यापेक्षा आज आपली लेक सुपात आहे आणि उद्या ती देखील जात्यात (बलात्कार्‍यांच्या हातात) गेली तर…? फक्त या विचारानेच अंगावर काटा आला ना, तुमच्या! म्हणूनच या असुरक्षित जगात पोरी तू जन्मच घेऊ नकोस, असं म्हटलं तर त्यात वावगं ते काय?

बलात्कार आणि क्रूर हत्या यांची बळी ठरलेल्या कोलकात्यातील डॉटर तरुणीपेक्षा, बदलापूरातील दोन लहान मुलींवर शाळेतच झालेल्या अत्याचारापेक्षा आईच्या गर्भातच स्त्रीभ्रूणहत्येला सामोर्‍या जाणार्‍या मुली किती तरी नशीबवान म्हणायच्या. मुली, स्त्रिया यांच्या बाबतीत घडणार्‍या क्रौर्याची प्रतवारी करायची तर ती अशीच करावी लागेल. या जगात येऊन कुणाची तरी लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडकी नात, पुतणी, भाची, मैत्रीण, बायको होऊनही कुणा वासनांधाच्या विकृतीची शिकार होण्यापेक्षा जन्मण्याच्या आधीच काय तो मृत्यू आलेला कधीही चांगला. काळजाचा तुकडा असलेल्या लेकीला प्रेमाने, लाडाकोडात वाढवण्याची, शिकवण्याची, हवे ते सगळे मिळवून देण्याची इच्छा बाळगणार्‍या आईबापांना एके काळी हुंडा नावाच्या छुप्या, पण भयंकर राक्षसाची दहशत होती. आजघडीला त्याची जागा बलात्कार या महाभयंकर अशा सैतानाने घेतली आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याची भीती बाळगत जगण्यापेक्षा ‘पापा की परी’ जन्माला न आलेलीच बरी, असे कोणत्याही आईबापांना आजघडीला वाटत असेल तर त्यात काय चुकीचे आहे?

कोलकात्यातील डॉटर तरुणीच्या निर्घृण हत्येनंतर देशभर निर्माण झालेला रोष याच सगळ्या पालकांचे प्रतिनिधित्व करतो. दिल्ली असो, हैदराबाद असो, कोलकाता असो की उत्तराखंड कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणारी स्त्री पुरुषांच्या विकृत क्रौर्याला सातत्याने बळी पडत असेल तर आपण खरोखर २१ व्या शतकात जगत आहोत का? किती वेळा या सगळ्याचा संताप व्यक्त करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरायचे? दर काही काळाने कुठे तरी पुन्हा अशी घटना घडली की चीड, उद्विग्नता, हताशा घेऊन मोर्चे काढायचे आणि तिच्या जागी आपली लेक नव्हती याचे समाधान मानायचे?

बलात्कार, क्रूर हत्या हा गेली काही वर्षे सातत्याने घडणार्‍या गुन्ह्यांच्या संदर्भातला भावनिक पसारा बाजूला ठेवला की उरते ते एकच सत्य, ते म्हणजे व्यवस्था. या सगळ्याला जबाबदार आहे ती पुरुषप्रधान व्यवस्था. स्त्रीच्या विरोधातला हा अतिशय किळसवाणा, नीच, घृणास्पद, क्रूर अत्याचार पुरुषाच्या मनातली तिची जागा तिला दाखवून देण्यासाठी, काहीही झाले तरी सामाजिक सत्तेच्या उतरंडीत मी तुझ्याहून श्रेष्ठच आहे, हे दाखवून देण्यासाठीच असतो. ज्या क्षणी एखादी स्त्री हवीशी होते, त्या क्षणी ती उपलब्ध असणे, नसेल तर काहीही करून ती मिळवणे आणि तिचा नकार असेल तर तिला जन्माचा धडा शिकवणे त्यासाठी क्रौर्याचे टोक गाठावे लागले तरी बेहत्तर. स्त्री-पुरुषांच्या नात्यातील सत्तासमतोल हा असा आहे. खरे तर तो समतोल नाहीच. तू स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहेस, ही भावना पुरुषांच्या मनात आपल्याच नाही तर जगातील बहुतेक सामाजिक व्यवस्थांमध्ये अगदी लहानपणापासून बिंबवली जाते.

ती घेऊनच ते वाढतात. शिक्षण, घरातील वातावरण, स्त्रीवादी विचार, संबंधित व्यक्तीची संवेदनशीलता या सगळ्याच्या परिणामी काही थोडके पुरुष या सगळ्यापासून वाचून अपवाद ठरतात खरे, पण बाकी अनेक जण हिंमत नसते म्हणून किंवा संधी मिळत नाही म्हणून साळसूद वावरत राहतात. घरी मारहाण करणे, रस्त्यावर छेड काढणे, अश्लील बोलणे, अश्लील लिप्स पाठवणे, अंगचटीला जाणे असे ‘पुरुषार्थ’ या सगळ्यातूनच येतात.

हजारो वर्षे जिला घरात डांबून ठेवले, चूल आणि मूल एवढेच करायला लावले ती स्त्री आधुनिकतेच्या रेट्यात व्यक्ती म्हणून विकसित होत गेली आहे, तिच्यावर लादलेल्या बेड्या फेकून देते आहे. अडथळ्यांवर मात करते आहे. लिंग, जात, वर्ग या सगळ्याच ठिकाणच्या पुरुषी मक्तेदारीला तिने आव्हान दिले आहे. ते थोपवण्यासाठी, संपवण्यासाठी बलात्कार, क्रौर्य याशिवाय दुसरे कुठले मार्ग पुरुषाकडे असू शकतात? काही वर्षांपूर्वी झालेल्या एका पाहणीमध्ये ‘तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते,’ असा प्रश्न स्त्रियांना विचारला गेला होता, तेव्हा बहुतांश स्त्रियांनी ‘बलात्काराची’ असे उत्तर दिले होते. म्हणजे जिवाच्या भीतीपेक्षाही त्यांना बलात्काराची जास्त भीती वाटत होती.

त्यामुळेच एकीवर बलात्कार झाला की शंभर मुलींचा अवकाश सीमित होत जातो. त्यांच्या मोकळेपणाने वागणे बोलणे, वावरणे, उशिरापर्यंत बाहेर असणे यासह अनेक गोष्टींवर बंधने येतात. बलात्कार झाला की पुढचे सगळे आयुष्य ‘बरबाद’ होते, अशा कल्पना बिंबवल्या जातात. तिची बेअब्रू होऊ नये म्हणून तिची ओळख लपवली जाते. पण हे सगळे अशाच पद्धतीने का करत राहायचे? मुळात स्त्रीची अब्रू हे कुठले काचेचे भांडे नाही, बलात्कार हा त्या व्यक्तीविरोधातील व्यक्तिगत गुन्हा नाही, तर तो पुरुषसत्ताक मानसिकतेने केलेला ‘राजकीय’ गुन्हा आहे, हे आपण जोपर्यंत नीट समजून घेत नाही, मुलींच्या मनांवर बिंबवत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शयता खूपच कमी आहे.

आपल्या राजकारण्यांकडे ही परिपक्वता नाही, हे तर उघडच आहे. अन्यथा काही वर्षांपूर्वी घडले ते हैदराबादमधील बलात्कार्‍याचे ‘एन्काउंटर’ घडते ना. बलात्कार्‍यांना ताबडतोब फाशीच द्या, ही मागणी सामान्यांकडून अत्यंत त्वेषाने होणे, हे समजण्यासारखे आहे. पण ममता बॅनर्जींसारख्या कसलेल्या राजकीय नेत्याही निव्वळ आपल्या राजकारणासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला कोलकात्यातील बलात्कार हत्याप्रकरणी रविवारपर्यंत फाशीच्या शिक्षेचा निर्वाणीचा इशारा देतात, तेव्हा सगळेच हास्यास्पद होऊन जाते. हजारो वर्षे घडत- बिघडत आलेली मानसिकता झट की पट फाशी या न्यायाने कशी सुधारणार आहे? उलट त्यामुळे ती आणखीच बिघडेल असे काहीसे चित्र निर्भया कायद्यातून दिसून आले आहे. १९७५ मधले मथुरा बलात्कार प्रकरण ते २०१२ चे दिल्लीतील निर्भया प्रकरण या ३५-३७ वर्षांच्या काळात बलात्कारविरोधी कायद्यासंदर्भात बर्‍याच घडामोडी घडत गेल्या आहेत.

निर्भया प्रकरणानंतर या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद करण्यात आली तेव्हा यामुळे बलात्कारितांच्या हत्यांचे प्रमाण वाढेल, असेही म्हटले गेले होते. ते काही प्रमाणात खरे होताना दिसत आहे.कोलकाता प्रकरणातील तपशील जसजसे पुढे येत आहेत, तसतसे त्यातील अनेक गोष्टी सगळ्यांनाच कमालीच्या अस्वस्थ करणार्‍या आहेत. बलात्कारानंतर संबंधित डॉटर तरुणीच्या बाबतीत जे क्रौर्यकर्म केले गेले, तिच्या शरीराची ज्या पद्धतीने विटंबना करण्यात आली, ते हिणकस म्हणण्याच्याही पलीकडचे आहे. माणूस माणसाशी असा वागू शकतो? संबंधित आरोपी पोलीस मित्र असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि गुन्हेगार यांच्यामधली सीमारेषा अत्यंत पुसट असल्याचे सांगितले जाते, ते या प्रकरणातून पुन्हा एकदा खरे ठरताना दिसते आहे.

इतया मोठ्या रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सीसीटीव्ही नव्हता, हे आणखी एक विशेष. रुग्णालयाने सुरुवातीला या प्रकरणाची आत्महत्या म्हणून बोळवण करायचा प्रयत्न केला, हेदेखील आपल्याकडे नेहमी घडते त्या प्रकारामधलेच. आणि या सगळ्यामुळे रुग्णालयावर हल्ला करणार्‍या जमावाने येऊन रुग्णालयाची अपरिमित मोडतोड, हानी केली हेदेखील आपल्या एकूण मानसिकतेला धरून असणारेच. फक्त कुठल्या सर्वसामान्य माणसाची समूहाबरोबर जाऊन असे काही करायची हिंमत होऊ शकते, हा प्रश्न विचारला की त्याची उत्तरे वेगळी मिळतात. दिल्लीतील तरुणीला निर्भया म्हटले गेले होते, तसे आता या तरुणीला अभया म्हटले जात आहे. पण अभया असो की निर्भया, घरीदारी, कामाच्या ठिकाणी कुणीच, कुठेच सुरक्षित नाही. अशा असुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस, असं म्हटलं तर त्यात वावगं ते काय?

सावित्रीच्या लेकी, आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती!
बलात्कार हा नेहमीच शारीरिकच असतो असं नाही. कुणाच्या अश्लिल नजरा… कोणाचे ओंगळवाणे स्पर्श… कोणा अनोळख्याचेच कशाला, जेव्हा ते आपल्याच माणसांचे असतात तेव्हा ते जास्त त्रासदायक असतात. कलकत्ता असो वा बदलापूर मुलगी, बाई ही केवळ उपभोगाची वस्तू आहे असं समजून तिला ओरबाडलं जातं. बाई ही केवळ उपभोगाची वस्तू आहे असं समजून तिला ओरबाडलं जातं. तिचं शोषण होत राहतं. कधी नकोशी म्हणून गर्भातच मारली जाते तर कधी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली तिचा आवाज दाबला जातो. खूप कमी वेळा तिच्यात संघर्ष करण्याची ताकद उरते. अनेकदा तिला मरण सोपं आणि जगण अवघड होऊन जातं तिच्या व्यथा मग सामान्य जनतेसाठी कुतूहल, चर्चेचा विषय ठरतो. तिच्यासाठी मेणबत्ती मोर्चे निघतात समाजमाध्यमांवर तिच्यावर कसा अन्याय झाला याच्या चर्चा होत राहतात. तिची, तिच्या कुटुबियांची ओळख उघड करत सहानुभूती पेरण्याचा प्रयत्न होतो. ती निर्भया, दामिनी अशा नव्या नावांशी ओळखली जाते. पण या लाटेत मूळ मुद्दा बाजूला पडतो तो- तिच्यावर अत्याचार करणार्‍या व्यक्तीला झालेली शिक्षा, तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस असो वा प्रशासन यांनी केलेले प्रयत्न. अशा विकृतींवर जरब बसवण्यासाठी ‘महिलांची सुरक्षितता’ या गोंडस नावाची झालर चढवली जाते. या विचारात असतानाच पुन्हा त्या लहानगीवरील अत्याचारानं तिचं मन हेलावून जातं. तिला स्वसंरक्षणाचे धडे द्यायचे. तिच्याजवळ मिरचीपुड ठेवायची गुड टच बॅड टच शिकवायचा असं बरंच काही मनात घोळवत असताना दुसरीकडे हे सारं ती चिमुकली झेपवणार कसं याबाबतही विचार होण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...