spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये तुफान पाऊस; सीना नदीला पूर, अनेकांच्या घरात शिरले पाणी, खासदार लंके,...

अहमदनगरमध्ये तुफान पाऊस; सीना नदीला पूर, अनेकांच्या घरात शिरले पाणी, खासदार लंके, आमदार जगताप यांनी घेतली अशी भूमिका…

spot_img

सीना नदीला पूर, अनेकांच्या घरात शिरले पाणी | जिल्ह्यात ४३.७ मिलीमिटर पावसाची नोंद
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी संपर्क तुटला आहे. नगर शहरातून वाहणार्‍या सीना नदीला पावसाळ्यातील पहिला पूर आला.

नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल १२ तास वाहतूक ठप्प होती. आलेल्या पुरामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात एकाच दिवसात ४३.७ मिलीमिटर तर आतापर्यंत जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या १०५ टक्के पाऊस झाला आहेअहमदनगर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ठिकठिकाणी दमदार पाऊस हजेरी लावत आहे. तर तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. एकाच दिवसात तब्बल ४३.७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला. सध्याच्या पाऊस कांदा, बाजरीसाठी फायदेशीर असला तरी मुगासाठी मात्र अडचणीचा ठरत आहे. हातातोंडाशी आलेले मुगाचे पिक वाया जाण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे. नगर -६३.७, पारनेर – ३५.३, श्रीगोेंदा- २२.९, कर्जत- २५.५, जामखेड – ६६.७, शेवगाव- ५४.१, पाथर्डी – ७२.६, नेवासा-४९.७, राहुरी-४९.८, संगमनेर-२८.८, अकोला-२१.७, कोपरगाव-७२.२, श्रीरामपूर-२३.६, राहाता-३७.६ मिलीमिटर पाऊस झाला. एकाच दिवशी ४३.७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान पुढील दोन दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच २८ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २३ मंडलात अतिवृष्टीशुक्रवारी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. तब्बल २३ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. सावेडी ८३.८, नागापूर १०२.३, जेऊर १३०, चिचोंडी ८४, जामखेड ७२, नानज ७२, खर्डा ७९.३, शेवगाव ७१.५, बोधेगाव ६९.८, पाथर्डी ७१, माणिक दौंडी ७१, कोरडगाव ८१.८, करंजी ९२.५, मिरी ६८, नेवासा खु. ६६, वडाळा ६६, ब्राम्हणी ७७, वांबोरी १०२.३, तळेगाव ६५.८, शेंडी ६५, कोपरगाव ८१, रवंदे ८१, दहिगाव ६७ मिलीमिटर पाऊस झाला.

आपत्ती विभागाचे पथक तैनात : आयुक्त
नगरमध्ये ८० ते १०० मिलीमिटर पाऊस झाल्याने सीना नदीला पूर आला आहे. पहाटे चार वाजेपासून महापालिकेचे आपत्ती विभागचे पथक पूर आलेल्या भागात तैनात करण्यात आले आहे. पुलाचे काम सुरु असल्याने साडेचार वाजेपासून पुलावरील वाहतूक बंद केली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून वारुळाचा मारुती, माधवनगर ते नेप्तीनाका असा रस्ता असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. तसेच प्रभाग अधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मातीचा भराव, अतिक्रमण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत: आ. जगताप
शहरातून सीना नदी वाहत असून पात्रामध्ये मोठी अतिक्रमणे झाली आहे. काही ठिकाणी मातीचे भराव टाकल्यामुळे पावसाळ्यामध्ये सीना नदीला पूर आल्यानंतर कल्याण राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला बंद करावा लागतो. वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. सीना नदी पात्रात मातीचा भराव, अतिक्रमण करणार्‍यांवर महापालिका, जिल्हाधिकारी प्रशासनाने तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केली. तसेच महापालिका प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी काळजी घेण्याच्या सुचना आ. जगताप यांनी दिल्या. मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त यशवंत डांगे, माजी सभापती अविनाश घुले, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता दिलीप तारडे, युवराज शिंदे आदीसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. जगताप म्हणालेे, केंद्र सरकारकडून पुलाच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करून घेतला असून त्याचे काम देखील सुरू आहे. पुढील वर्षी या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर पावसाच्या पुरामुळे होणार्‍या वाहतूक बंदचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. तोपर्यंत प्रशासनाने तातडीने माधवनगर मधील रस्ता सुरू करून वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा. नगर शहरांमधून वाहत असलेली सीना नदी, ओढू, नाले यावरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. बहुतांश पुलाचे काम मार्गी देखील लागले आहे. सावेडी गावातून बोल्हेगाव सीना नदी मार्गावरील पुलाचे काम मंजूर झाले असून ते देखील सुरू होणार आहे.
नागरिकांच्या मदतीला धावले खासदार लंके
शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर शहरातील नरहरी नगर, गुलमोहर रोड येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना अख्खी रात्री जागून काढावी लागली.नागरिकांनी नगरसेवक योगराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली. त्यांनी लगेचच हि माहिती खासदार नीलेश लंके यांना दिली. नगरसेवक गाडे यांनी दिलेल्या माहितीची तात्काळ दखत घेत खा. लंकेंनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची स्थिती पाहून, त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क केला. नागरिकांनी वारंवार येणार्‍या या समस्येचा उल्लेख केला असता खा. लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.
नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. खडकवासला, घोड व इतर धरणातुन विसर्ग सुरु असल्याने  श्रीगोंदा तालुक्यातील भीमा व घोड नदी तसेच कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातुन गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झालेली असून  प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ झालेली आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते.पर्यायाने ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी,ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.  नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालिन परिस्थितीमध्ये नजीकच्या तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री) अथवा 0241-2323844, 2356940 येथे संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर अतुल चोरमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...