मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन निवडणूकांच्या वेळापत्रकाची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूकीच्या पाश्ववभूमीवर महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या उमेदवारांची पहिली यादी अकटोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संकेतांनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी १० ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीत १६० हून अधिक जागांवर उमेदवार लढवण्याचा निर्धार केला आहे. याबाबत भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागा वाटपावर रस्सीखेच सुरू आहे.
गेल्या निवडणुकीत जितक्या जागा लढवण्यात आल्या, तितक्याच जागा लढवण्याची भाजपची मानसिकता आहे. भाजपच्या १६० जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे मिळून १२५ ते १३० जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपावरून पुढील काळात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.