अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या जामीनास फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून मेडीकल पॅरीटीवर दिलेल्या जामीन बाबत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पीटिशन करून आव्हान दिले आहे. मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती शंकर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राऊत म्हणाले, जिल्हा बंदी उठलेले सचिन कोतकर नगर जिल्ह्यात आल्यावर त्याने एका हॉटेल कमगारास मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामधील कलम ३५१ (३) मध्ये ७ वर्ष शिक्षेची तरतुद आहे. मात्र ३ महिन्यात अजून कोणताही तपास झाला नाही. या प्रकाराबाबत सचिन कोतकरचा जामीन रद्द करावा. कोतकरने पुन्हा गुन्हेगारी करण्यासाठी डोके वर काढलेे आहे. नगर जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करावी अशा प्रकारची जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयाने काँग्रेसचे तात्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान, २०१९ मध्ये मूळ शिक्षेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. संदीप, सचिन, अमोल कोतकरला मेडीकल पॅरीटीवर मिळालेल्या जामीनास राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.या प्रकरणात अॅड. जितेंद्र गायकवाड आणि अॅड. पाटील हे कामकाज पाहत आहेत.