spot_img
अहमदनगरगुरुजी : विश्वासात घ्यायचं म्हणजे नक्की काय हो?

गुरुजी : विश्वासात घ्यायचं म्हणजे नक्की काय हो?

spot_img

आशिष येरेकरजी; एकदाचं दूध का दूध अन् पानी का पानी कराच! मुख्यालयी न राहणार्‍यांपासून सारेच एकदाच तपासा!

सारिपाट | शिवाजी शिर्के: –

रोज एकमेकांशी भांडणार्‍या, प्रसंगी एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या घालणार्‍या शिक्षक संघटनांच्या नेत्यांमध्ये नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. बँकेतील मलिद्याच्या मुद्यावर रोज एकमेकांची उणीदुणी काढणारे प्राथमिक शिक्षकांच्या तब्बल १५ संघटनांचे नेते येरेकरांच्या कार्यपद्धतील कंटाळले आहेत आणि येरेकर संघटनांच्या नेत्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आहेत. आरोपात तथ्य असेलही! मात्र, ‘विश्वासात घ्यायचं’ म्हणजे नक्की काय करायचं हे आता अधिक स्पष्टपणे या शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी सांगण्याची गरज आहे. आपल्या सोयीने अधिकार्‍यांनी भूमिका घेतली की तो अधिकारी चांगला आणि शासनाच्या आदेशानुसार काम करुन घेण्याची भूमिका घेतली तो अधिकारी वाईट ही परंपराच नगरमध्ये शिक्षक संघटनांनी घेतल्याचे दिसून येत आहे. खरंतर येरेकर यांनी शिक्षकांना जी कथीत कामे आदेशित केली आहेत किंवा करत आहेत, ती कामे येरेकर यांच्या घरची नक्कीच नाहीत. शासनाने आदेशित केलेली कामे असताना येरेकरांच्या विरोधात रान पेटविणार्‍या शिक्षक संघटनांच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दलच संशय येऊ लागला आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या नगर मधील १५ संघटना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात एकत्र आल्या असल्याचे पत्रक समाजमाध्यमांसह अन्य माध्यमांमधून व्हायरल झाले आहे. याशिवाय दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार आणि ६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय या संघटनांनी जाहीर करताना शिक्षक संघटना समन्वय समितीने ‘आम्हाला शिकवू द्या’ या मोर्चाचे आयोजन केल्याचे त्यात म्हटले आहे. प्राथमिक शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढवला जात आहे. राज्य सरकार रोजच वेगवेगळे उपक्रम शिक्षकांवर लादत आहे. प्रत्येक उपक्रम राबवताना कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मूळ शैक्षणिक कार्यावर परिणाम झाला आहे. शाळा किंवा इतर उपक्रमांची माहिती देताना छायाचित्र,माहिती लिंकवार पाठवणे, व्हॉट्सअप माहितीचे छायाचित्र, लिंक पाठवणे, सरकारकडून येत असलेले सर्वेक्षणाचे विविध कामांसह अशैक्षणिक कामांचा बोजा वाढवला जात आहे. या सर्व अशैक्षणिक कामाचा ताण कमी करण्याच्या मागणीसाठी मोर्चा असणार आहे, अशी माहिती समन्वय समितीचे रावसाहेब रोहोकले, डॉ. संजय कळमकर, आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे, सुनील बनोते, कल्याण लवांडे, राजेंद्र निमसे, राजेंद्र ठोकळ आदींनी त्यात म्हटले आहे.

संघटनांच्या निवेदनात नमूद केल्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून मिशन आरंभ ही अत्यंत चांग़ली योजना जाहीर केली. शिष्यवृत्तीमध्ये मुलांची तयारी व्हावी आणि त्यातून मुलांची चांगली शैक्षणिक प्रगती व्हावी हा त्यातील उद्देश. मात्र, शिक्षकांना ही योजनाच नकोशी वाटू लागली आहे. याशिष्यवृत्ती उपक्रमाला शिक्षकांचा विरोध नाही असे एका बाजूला  शिक्षक संघटना म्हणत असताना दुसर्‍या बाजूला ही योजना दडपशाहीने राबविण्यावर प्रशासनाचा भर असल्याचा आरोप ते करतात.शिष्यवृत्ती परिक्षा ही फक्त हुशार मुलांसाठी असल्याचा जावई शोध शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने लावला आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परिक्षेत सरसकट शंभर टक्के मुले बसविणे चुकीचे असल्याचे मत या समितीने व्यक्त केले आहे. आशिष येरेकर यांनी अत्यंत चांगल्या हेतूने ही शिष्यवृत्ती परिक्षा सर्वच विद्यार्थ्यासाठी घेण्याची सुचना केली आणि अत्यंत रास्त असताना ती फक्त हुशार मुलांसाठी राबवा अशी चुकीची मागणी करून संघटनेचे नेते काय साध्य करुन घेणार आहेत? उपक्रम राबवताना संघटनांना विश्वासात घेण्याची आणि त्यातून शिक्षकांची सकारत्मक दृष्टी तयार करण्याचे काम संघटना करत असल्याचा दावा शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने केला आहे.
शब्दांचा खेळ करत तयार करण्यात आलेल्या वाक्यातच मोठी गंमत आहे. शिक्षकांची सकारात्मक भूमिका जर संघटना आणि संघटनेचे नेते तयार करत असतील तर राज्य शासनाने शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना घरी बसविले पाहिजे. मुळातच १५ पैकी दहा संघटनांचे आजी- माजी पदाधिकारी बनावट अपंग दाखले मिळवून आरोपी झालेले आहेत. काहींवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली आहे. खरं तर शिक्षकांच्या हजेरीसाठी क्युआर कोड पद्धतीने हजेरी घेण्याची अत्यंत चांगली योजना येरेकर यांनी तयार केली आहे. त्यातून रिकामटेकडे मास्तर कुठेही हिंडणार नाहीत आणि शाळेतच सापडतील अशी अपेक्षा! मात्र, शिक्षकांना ही सक्तीची हजेरी नकोय! जिल्हा परिषद प्रशासनाने येत्या चार दिवसात मुख्यालयी थांबणार्‍या शिक्षकांचा त्रयस्तपद्धतीने सर्व्हे करण्याची गरज आहे. गावागावातील ९० टक्के पेक्षा जास्त शिक्षक मुख्यालयी थांबत नाहीत आणि असे असतानाही ते शासनाकडून घरभाडे भत्ता घेतात. आशिष येरेकर यांनी येत्या दोन दिवसात याची माहिती घेतली तर मुख्यालयी राहत नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून घरभाडे भत्ता घेतल्याप्रकरणी ९० टक्के शिक्षकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्यांच्याकडून ती वसुली होऊ शकते.
अर्थात ही गोष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी असणार्‍या येरेकर यांना माहिती नाही असेही नाही! मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल. मग, जर असेल आणि दुसर्‍या बाजूला चांगल्या कामाच्या अपेक्षेने त्यांच्याकडून काही योजना तयार केल्या जात असतील तर त्याला शिक्षकांनी आणि त्यांच्या कथीत संघटनांनी पाठबळ देण्याची गरज आहे. ‘शिकवू द्या’, असंच म्हणायचं असेल तर ते शासनाकडेे म्हटले पाहिजे. शिक्षणमंत्र्यांचे त्यात लक्ष वेधले पाहिजे! पण, हे करण्याआधी आपण कुठेच चुकलो तर नाही ना आणि आपण चुकीच्या पद्धतीने शासनाला फसवून आर्थिक फायदे तर घेत नाही ना, याचेही भान शिक्षक आणि त्यांच्या कथीत संघटनांच्या नेत्यांनी जपण्याची गरज आहे. विश्वासात घ्याचंच असेल तर मग सार्‍याच मुद्यांवर विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी जशी जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख म्हणून आशिष येरेकर यांची आहे तशीच ती शिक्षक संघटनांच्या नेत्यांची आणि या नेत्यांना साथ देणार्‍या शिक्षकांचीही आहे इतकेच!
बनावट अपंग दाखल्यांचे ‘नाजूक’ प्रकरण दाबण्यासाठी दबाव तर नाही ना!
बनावट अपंग दाखल्यांच्या कथीत प्रकरणात जिल्ह्यात सर्वाधिक शिक्षक अडकले आहेत आणि त्यातही शिक्षक संघटनांचे नेतेच जास्त आहेत. या नेतेमंडळींनी बनावट दाखले घेतले आणि त्या दाखल्यांच्या आधारे शासनाचे फायदेही लाटले. यातील काही निवृत्त झाले असले तरी त्यांच्यातील ‘राया’ सारखे बहाद्दर आजही जेलमध्ये जाऊ शकतील असे ढीगभर पुरावे जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त आहेत. यातील एखादी फाईल जरी वर काढली तर शिक्षक नेत्यांपैकी निम्मे आजच पोलिसांच्या जेलची हवा खातील. बुडाखाली प्रचंड अंधार असल्याने तो बाहेर काढू नये यासाठी आता शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी शिक्षकांच्या फायद्याची गोष्ट बोलण्यास प्रारंभ केल्याचा संशय बळावत आहे. ‘आम्हाला शिकवू द्या’, असं गोंडस स्लोगन देत आंदोलनाचा इशारा देणार्‍या शिक्षकांना येरेकरांनीच काय कोणीच अडवलं नाही. मात्र, जेलची हवा नको आणि भानगडी चव्हाट्यावर नको यासाठीच ही नेतेमंडळी एकत्र आली असल्याचा संशय आता सामान्य जनतेला येऊ लागला आहे.
सार्‍याच व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवणार का?
सर्व सरकारी ‘व्हॉट्सअप ग्रुप’मधून बाहेर पडण्याचा निर्णय शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने जाहीर केला आहे. खरेतर हा चांगला निर्णय आहे. मात्र, शिक्षकांनी बँकेसह सार्‍याच संघटना आणि इतरही सर्वच व्हॉटसअप गु्रपमधून बाहेर पडण्याची गरज आहे. त्यातून या शिक्षकांचा बराचसा वेळ विद्यार्थ्यांना शिकविण्यात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडविण्यासाठी जाईल. बँकेसह संघटनेतील कुटाळक्या करणे आणि एकमेकांवर साखर कारखान्यातील सभासदांप्रमाणे चिखलफेक करणे, त्यातून आरोप करणे आणि प्रसंगी रात्री- अपरात्री एकमेकांच्या आयाबहिणी काढण्यापर्यंतची प्रकरणे याच व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून घडली आहेत. नुकताच शिक्षक बँक पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सावेडीतील एका शिक्षकांच्या घरी कोणाला कसे फटकावले, कशी शिवीगाळ झाली आणि धुंद उतरल्यानंतर प्रकरण शांत कसे झाले हे या समन्वय समितीचे शिक्षक नेते विसरले आहेत का? त्यामुळे व्हॉटसअप ग्रुपमधून बाहेर पडायचेच असेल तर फक्त शासकीय नव्हे तर शिक्षक बँकेसह अन्य सार्‍याच गु्रपमधून बाहेर पडण्याची हिम्मत शिक्षक नेते दाखवणार आहेत का?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...