Vidhan Sabha Election:आगामी विधानसभेचे वारे राज्यात वाहण्यास सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात दणदणीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी पुन्हा रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. तर आता लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुती देखील तयारीला लागली आहे.
दरम्यान काही दिवसातच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे पथक २७ आणि २८ सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या तारखांची घोषणा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.
सध्या जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांचे मतदान सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहे, तर हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. यानंतर, निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तयारीकडे लक्ष देणार आहे.
निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली नाही, पण महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे, त्यानुसार त्या तारखेपूर्वी निवडणुका पूर्ण होणार आहेत. यामुळे आता आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा होणार
निवडणूक आयोगाच्या आढावा दौऱ्यानंतर १५ किंवा २० दिवसांनी निवडणुका जाहीर केल्या जातात. यासोबतच विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वी निवडणूक प्रक्रियाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यातच महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात.
महाविकास आघाडीच्या फॉर्मुला जवळपास निश्चित
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस देखील १०० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ८४ जागा मिळाल्या आहेत, तर उर्वरित चार जागा मित्रपक्षांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.